Crime News : सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुशांत जनार्दन दळवी असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे कळसुली गावचे रहिवासी होते. शुक्रवारी सकाळी कणकवली जवळील मुरे डोंगरी परिसरात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांच्यासह पोलीस पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस यंत्रणेने वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या काही तासांत या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. सुशांत दळवी यांची हत्या त्यांचाच मुकादम अमर सत्यवान कदम याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कुडाळ ओरस परिसरातून अमर कदमला ताब्यात घेतले असून त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत दळवी आणि अमर कदम हे दोघेही शिकारीसाठी डोंगराळ भागात गेले होते. दळवी यांना शिकारीचा छंद होता, मात्र, शिकारीच्या दरम्यान ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून किंवा उद्देशाने करण्यात आली, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.
कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. दळवी यांचे पार्थिव पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.







