जयपूर: महाराष्ट्रावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला (Air India Landing Fail) असतानाच जयपूरमध्ये एक मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली आहे. बारामती येथे झालेल्या भीषण (Ajit Pawar Plane Crash) अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या ४ सहकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर विमानतळावर लँडिंग फेल झाले. या विमानात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा प्रवास करत होते.

एअर इंडियाचे विमान (AI १७१९) दिल्लीहून जयपूरसाठी निघाले होते. दुपारी १:०५ च्या सुमारास वैमानिकाने लँडिंगचा पहिला प्रयत्न केला. मात्र, धावपट्टीला विमानाची चाके स्पर्श करताच तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे विमान अस्थिर झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने क्षणाचाही विलंब न लावता ‘गो अराउंड’चा निर्णय घेतला आणि विमान पुन्हा हवेत झेपावले. तब्बल १० ते १५ मिनिटे आकाशात घिरट्या घातल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे खाली उतरले.
विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, ‘गो अराउंड’ ही वैमानिकाच्या सतर्कतेचा भाग असते. जर लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर काही अडथळा असेल, हवामान खराब असेल किंवा विमानाचा वेग आणि कोन योग्य नसेल, तर वैमानिक सुरक्षिततेसाठी लँडिंग रद्द करून पुन्हा उड्डाण करतो. या प्रक्रियेमुळे मोठा अपघात टळण्यास मदत होते.
दुसरीकडे, बारामतीमध्ये झालेल्या दुर्घटनेत अजित पवार (६६), त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, सहाय्यक पिंकी माळी आणि दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे विमान लँडिंगच्या वेळी कोसळून त्यात भीषण स्फोट झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्लीहून ‘एएआयबी’चे विशेष पथक बारामतीमध्ये दाखल झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय तपासाचे आश्वासन दिले आहे.







