Agriculture News: राहुरी : हवामानातील सतत होणारे बदल हे शेतीसमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बदलत्या हवामान परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकार जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यातील सुमारे 10000 गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीचा प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या 39 व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पारंपरिक शेती पद्धती अधिक जोखमीच्या बनत आहेत. त्यामुळे कृषी संशोधन संस्थांनी बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या आणि स्थिर उत्पादन देणाऱ्या नवीन पीकवाणांच्या संशोधनावर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि हवामानानुसार शेती करण्याबाबत मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी तात्पुरती उपाययोजना असली तरी ती कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याची संधी मिळते, मात्र शेतकरी कायमस्वरूपी कर्जाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी शाश्वत शेती पद्धती विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी संशोधक आणि कृषी विद्यापीठांची भूमिका या प्रक्रियेत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. हवामान बदलाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि टिकाऊ शेतीचे मॉडेल विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यापूर्वी सरकारचा दृष्टिकोन शेतीकडे मुख्यतः आपत्ती नंतर मदत देण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून शेती अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सिंचन, तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ यावर लक्ष केंद्रित करून शेती अधिक टिकाऊ आणि नफ्याची करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.






