मुंबई: 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ कसा असेल, याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये अंतिम टप्प्यात हुकलेली ट्रॉफी यावेळी जिंकण्यासाठी भारतीय संघ कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांकडून संभाव्य संघाबाबत विविध मतं व्यक्त केली जात आहेत.

भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनेही 2027 वर्ल्ड कपसाठी आपला संभाव्य 15 सदस्यीय संघ निवडला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामधील खेळपट्ट्या आणि परिस्थिती लक्षात घेऊन त्याने संघाची निवड केली आहे. या संघातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना दिलेले स्थान.

दिनेश कार्तिकच्या संघात सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. तर युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला बॅकअप ओपनर म्हणून संधी देण्यात आली आहे. यशस्वीने अलीकडच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आपली दावेदारी मजबूत केली आहे.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी कार्तिकने केएल राहुल आणि इशान किशन यांची निवड केली आहे. या स्थानासाठी संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांचीही चर्चा असली तरी कार्तिकच्या मते राहुल आणि किशन संघासाठी योग्य पर्याय ठरू शकतात.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांना स्थान देण्यात आले आहे. फिरकी विभागात कुलदीप यादव हा प्रमुख पर्याय असेल. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्यासोबत शमी आणि भुवनेश्वर यांच्यावर असेल.
दिनेश कार्तिकच्या संभाव्य टीममध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार असणार आहे.
शमी आणि भुवनेश्वर यांच्या निवडीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. भुवनेश्वरने बराच काळ वनडे क्रिकेट खेळलेले नाही, तर शमीही काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, त्यांच्या अनुभवाचा विचार करून कार्तिकने त्यांना संघात स्थान दिले आहे.






