पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तिसऱ्या महापालिकेची सध्या गरज नाही. भविष्यात आवश्यकता भासल्यास ती स्थापन करण्याचा विचार करू, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी तीन महापालिकांची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सध्या तिसऱ्या महापालिकेची गरज नाही. पुणे महानगर क्षेत्राचे स्वतंत्र नियोजन पीएमआरडीएद्वारे करण्यात येत आहे.”
फडणवीस पुढे म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका आधीच आहेत. अजून एक महापालिका स्थापन करण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, पीएमआरडीएची कार्यक्षमता लक्षात घेता सध्या त्याची तातडीची गरज नाही. भविष्यात शहरीकरणाच्या वाढत्या गतीनुसार हा विचार करावा लागेल.”
पुणे महापालिकेत 32 गावांचा समावेश झाल्यानंतर महापालिकेचे क्षेत्रफळ 510 चौ.किमी.पेक्षा अधिक झाले असून, आकाराने ती मुंबईपेक्षा मोठी झाली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्राचा कारभार एका महापालिकेकडून सांभाळणे अवघड असल्याची मते व्यक्त होत आहेत.
यावर उपाय म्हणून हडपसर परिसरासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी पुढे आली. या मागणीला स्थानिक नेत्यांसह अनेकांनी पाठिंबा दिला होता. तसेच, याबाबत मंत्री पातळीवर अनेकदा चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे पुणे महापालिकेचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
तथापि, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्टपणे सांगितले की, तिसरी महापालिका तूर्तास होणार नाही. त्यामुळे या विषयावर चालू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.






