पुणे: राज्यात पावसाने जोरदार (Maharashtra Heavy Rain) हजेरी लावत अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेत राज्य सरकारला तातडीच्या मदतीचे आवाहन केले आहे.

शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “जेथे नेहमी पावसाचे प्रमाण कमी असते, अशा भागांत यंदा प्रचंड अतिवृष्टी झाली. त्याचा थेट परिणाम शेती, गुराढोरांचे पालन आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनावर झाला आहे.”
या प्रकारच्या नुकसानासाठी मदत…
यावेळी पवारांनी सांगितले की काही बाबींसाठी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. एकतर पिकांच नुकसान, दुसरं गुरंढोरं आणि तिसरं म्हणजे जमीन वाहून गेल्याची. जमीन वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे. अनेक वर्ष त्या जमिनी नापीक राहतात त्यात कोणतही पिक येत नाही. तसेच मराठवाडा आणि इतर भागातील गुरंढोरं वाहून गेले आहेत. याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही; पवार
पवार पुढे म्हणाले, “या काळात सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ झाली खरी, पण पाच दिवस पाणी वाफ्यात साचल्याने सोयाबीनसह इतर पिकं सडून गेली. त्यामुळे उत्पादन हाती येण्याआधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आम्ही दुष्काळ अनुभवला आहे, पण अशा प्रकारची अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही.”
सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी आणि दक्षिण नगर हे जिल्हे अतिवृष्टीमुळे सर्वाधिक बाधित झाले असून, या भागांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी पवार यांनी केली.
तातडीने नुकसानभरपाई द्यावी…
शरद पवार म्हणाले की, “केंद्र सरकारकडे नैसर्गिक आपत्तींमधील मदतीसाठी योजना आहे, त्याची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत केली जाते. त्यामुळे आता तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जावी.”
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पंचनामे करा
शरद पवारांनी शासनाकडे विशेष आग्रहाने सांगितले की, “पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि त्यानंतर तातडीची तसेच दीर्घकालीन मदत देण्यात यावी.”
अखेर, “ही परिस्थिती अभूतपूर्व आहे, त्यामुळे राज्य सरकारने केवळ औपचारिकतेपुरती मदत न करता गंभीरपणे निर्णय घ्यावेत,” अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.







