Satara Politics: सातारा : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांत भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यभरात 129 नगराध्यक्षपदे भाजपने (BJP) जिंकली आहेत. बहुतांश ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार 2 हजार ते 5 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. मात्र सातारा नगरपालिकेतील भाजप उमेदवार अमोल मोहिते यांनी मिळवलेले मताधिक्य राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. (Satara Politics)

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेत शाहू विकास आघाडीच्या सविता माने यांनी विजय मिळवला होता. त्यांना 14,789 मते मिळाली, तर शिवसेनेच्या युगेंधरा घाटगे यांना 7,199 मते मिळाली. या निवडणुकीत सविता माने यांना 7,590 मतांचे मताधिक्य मिळाले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा विजय असल्याचा दावा केला होता. मात्र सातारा नगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे चित्र बदलले.
साताऱ्याच्या ‘या’ वाघाने मारली बाजी
सातारा नगरपालिकेत भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 42,032 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांचा पराभव केला. अमोल मोहिते यांना एकूण 57,587 मते मिळाली, तर सुवर्णा पाटील यांना 15,555 मते मिळाली. या निकालामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा विक्रम झाल्याचे बोलले जात आहे.
या विजयामुळे सातारा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या अभिजीत बिचुकले यांना विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळाली. मात्र आवश्यक मते न मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.
एकूणच सातारा जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये भाजपचेच नगराध्यक्ष निवडून आल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.






