उरुळी कांचन, ता. 12 : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ, टिळेकरवाडीसह पूर्व हवेलीतील नदी व कालव्याच्या पट्ट्यातील भागात विद्युत रोहित्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मागील 6 महिन्यात 39 रोहित्र चोरी झाली असल्याची खात्रीशीर माहिती “पुणे प्राईम न्यूज” च्या हाती लागली आहे. या माहितीला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दुजोराही दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून नदीच्या पट्यातील कोरेगाव मूळ, बिवरी, थेऊरसह परिसरातील गावांमधून रोहित्रांची चोरी सातत्याने होत आहे. अनेक गावांतील निर्मणुष्य भागातील तसेच नदीकाठचा भाग, गावापासून दूर असलेल्या वस्ती परिसरातील विद्युत रोहित्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तांब्याचे वाढते भाव यामुळे चोरीचे प्रमाण वाढले असून याबाबत लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र पोलीस प्रशासन शोध घेत नाही की दुर्लक्ष करीत आहे अशी शंका परिसरातील नागरिकांच्या मनात येत आहे.
चोरीचे तांबे विक्रेते आणि मोड घेणारे पोलीस खात्यास माहीत नाही का? अशी चर्चा नागरिक आपसात करीत आहेत. सगळ्याच तक्रारी पोलीस ठाण्यात होत नाहीत. तसेच यामुळे शेतकऱ्यांच्या पिकास पाणी न मिळाल्याने शेत मालाचे नुकसान होते. पिण्याच्या पाण्याची गैरसोय अशा आपत्तींना तोंड द्यावे लागते. रोहित्रांच्या चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस तपास यंत्रणाने लवकरात चोरट्यांचे रॅकेट पकडावे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, चालू विद्युत प्रवाह बंद करणे, प्रचंड वजनाचे विद्युत रोहित्र खाली घेणे, त्यातील तांब्याच्या तारा चोरणे व काही मिनिटांच्या आतच पोबारा करणे या करिता विद्युत रोहित्र फोडण्यासाठी सुसज्ज यंत्रणेसह पाच ते सहा जणांची टोळीच कार्यरत असल्याचा संशय नागरिकांना आहे. पोलिसांनी अशा चोरट्यांच्या तातडीने मुसक्या आवळण्याची गरज आहे.
तांबे 700 रुपये किलो, त्यामुळे वाढल्या चोऱ्या
चोर बाजारातील तांबे धातूचा भाव सुमारे 600 ते 700 रुपये प्रतिकिलो असल्याने रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले आहे. असेही ग्रामीण भागातील काही नागरिकांचे म्हणणे आहे. एका विद्युत रोहित्रामध्ये सुमारे 100 ते 120 किलो तांबे असते आणि त्यामुळे एका विद्युत रोहित्र विक्रीतून सुमारे 70 ते 80 हजार रुपये मिळतात. काही वेळा ऑईलची पण विक्री केली जाते.
6 महिन्यात सुमारे 39 विद्युत रोहित्र चोरीला
गेल्या 6 महिन्यात सुमारे 39 विद्युत रोहित्र चोरीस गेले आहेत. नदीकाठ आणि दुर्गम भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण अधिक आहे. नागरी भागाशिवाय चोरी होणाऱ्या विद्युत रोहित्राच्या जागी नवीन जनित्र बसविण्यास दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते.
रोहित्र चोरट्यांना जोपर्यंत कडक शासन होणार नाही तोपर्यंत या रोहित्र चोरीच्या घटना होतच रहाणार आहेत. सापडलेल्या अशा टोळ्यांवर शासनाने मकोका कारवाई करावी. या चोरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आमदार रोहित्र बदलून देत आहेत. मात्र चोरीच्या घटनाही होत आहेत. त्यामुळे रोहित्र चोर पोलिसांनी गस्त वाढवून पकडावे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन, ता. हवेली






