यवत(पुणे): पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वळण घेण्यासाठी जागाच नसल्याने या परिसरातील नागरिक, व्यावसायिक व त्यांच्याकडे ये-जा करणारी मंडळी नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहने चालविताना आढळून येत आहेत यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणावेळी जेथे आवश्यक आहेत अशा ठिकाणी दुभाजक न ठेवता इतर ठिकाणी दुभाजक तयार करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी व्यवसायिकांनी विनापरवाना दुभाजक तयार केले आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाकडा पुल हे अपघाती क्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. अशातच जवळ असलेल्या दुभाजकाकडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या ठिकाणी किरकोळ अपघात होत असतात.
काही दिवसांपूर्वीच येथे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वेळ व इंधन वाचविण्यासाठी अर्धा ते एक किलोमीटरचा प्रवास अनेक लोक विरुद्ध मार्गाने करीत आहेत. महामार्गावरील असा अर्धा ते एक किलोमीटरचा रस्ता पार करताना अनेकांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागत आहे. किरकोळ अपघात नित्याचे झाले असून, वाहनांच्या वेगामुळे मोठा अपघातदेखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे अशा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ठिकाणी वाहतुकीच्या फेरनियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर कायमच मोठी वर्दळ असते. एका बाजूला वाखारी गावातून येणारा रस्ता तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल व सी. एन. जी पंप असल्याने एका बाजूला गावातून येणारी तर दुसऱ्या बाजूला पंपाकडे वाहने विरुद्ध दिशेने येतात. सरळ रस्त्याने प्रवास केला, तर एक ते दीड किलोमीटर पुढे जाऊन परत मागे यावे लागते. शिवाय परत तेवढेच अंतर पुन्हा मागे जावे लागते. त्यामुळे मोठा फेरा पडतो. परिणामी अनेक जण विरुद्धमार्गाने जाणे पसंत करतात. महामार्ग प्रशासनाने यासाठी योग्य नियोजन करून जर सर्व्हिसरोड केला असता, तर ही वेळ आलीच नसती. असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
विरुद्ध बाजूने वाहने येत असल्याने परिणामी या ठिकाणी किरकोळ अपघात वाढले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी रहदारी जास्त आहे, अशा ठिकाणी महामार्गावर सर्व्हिसरोड व्हावा व जेथे सिग्नलची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सिग्नल बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिसांनी वाहनांवर कारवाई करावी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहने मोठ्या प्रमाणात विरुद्ध बाजूने जात असून काही ठिकाणी मुख्य महामार्ग शेजारी तर काही ठिकाणी सेवा रस्त्यावर वाहने उभे केली जात आहेत. वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असूनही महामार्ग पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिक करत आहे. महामार्गावर विरुद्ध बाजूने येणारे व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहन चालकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.







