पुणे: पुण्यातील (Pune News) वाघोली परिसरात चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये (Chaitanya Techno School) घडलेल्या धक्कादायक घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने कानशिलात लगावल्याचा आरोप झाला असून या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या कानाला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास यथार्थ यादव (वय 12) हा विद्यार्थी वर्गात उपस्थित असताना शिक्षिका तृप्ती सक्सेना यांनी त्याला भर वर्गात जोरदार कानशिलात लगावली, असा आरोप विद्यार्थ्याच्या आईने केला आहे. या मारहाणीमुळे यथार्थच्या कानाला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी कानाला दुखापत झाल्याचा अहवाल दिला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत शिक्षिकेविरुद्ध 2945/2025 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट मुलालाच वर्गातून बाहेर काढण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी यथार्थला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
पालकांनी सांगितले की या घटनेमुळे यथार्थला गंभीर मानसिक धक्का बसला आहे आणि त्याच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. या प्रकरणामुळे पालक वर्गामध्ये संतापाचे वातावरण असून शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.







