उरुळी कांचन, ता. 26: येथील नामांकित सीबीएसई शाळा स्वामी विवेकानंद ॲकॅडमी येथे वार्षिक स्नेहसंमेलन “तेजोमय चैतन्य उत्सव” मोठ्या उत्साहात आणि भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली वातावरणात पार पडले. “नवरत्न-नऊ पवित्र रत्ने आणि मानवी जीवनाशी त्यांचा गुणात्मक संबंध” ही यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना होती. हा भव्य सोहळा बुधवारी (ता. 24) शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे साहेबराव कांचन उपस्थित होते. (Swami Vivekananda Academy in Uruli Kanchan)

साहेबराव कांचन यांनी मार्गदर्शन करताना, “आजच्या पिढीला तंत्रज्ञानासोबत शिस्त, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे बळ देणे अत्यावश्यक आहे,” असे सांगितले. यावेळी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश (तात्या) कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, सचिव पंडित कांचन, तसेच विश्वस्त सदस्य, पालक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वामी विवेकांनद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कांचन यांनी पालकांना मुलांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याचे आवाहन केले.”
शाळेचे प्राचार्य डॉ. सुमित दास यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक अहवाल सादर केला. शाळेची शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे यश आणि भावी योजना त्यांनी यावेळी मांडल्या. पालकांनी शाळेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
“आपली मुले नवरत्नांप्रमाणे अद्वितीय असून योग्य संस्कार, शिस्त आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्यांचे तेज उजळवणे हे आपले कर्तव्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी पूर्व-प्राथमिक प्रवेश प्रक्रिया जानेवारी 2026 पासून सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, सुमारे चार तास चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नऊ रत्नांचे महत्त्व व त्यांचा मानवी गुणांशी असलेला संबंध नृत्य, संगीत आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुमारे 3 हजार प्रेक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील समन्वय, ऊर्जा आणि कलात्मकता पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे पालक, पाहुणे व विश्वस्त सदस्यांनी भरभरून कौतुक केले. नियोजन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि नृत्य दिग्दर्शकाच्या योगदानाचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
अभिमान, प्रेरणा आणि आनंदाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. “ज्ञान, संस्कृती आणि उत्कृष्टता” ही स्वामी विवेकानंद ॲकॅडमीची ध्येयधारणा या स्नेहसंमेलनातून अधिक ठळकपणे अधोरेखित झाली.







