पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील (Shirur News) दहिवडी येथील मांजरेवस्तीमध्ये गेल्या 21 महिन्यांपासून गूढ राहिलेल्या दोन बालकांच्या मृत्यूचे रहस्य अखेर (Shirur Crime) उलगडले असून या प्रकरणाने संपूर्ण (Pune Crime) परिसर हादरून गेला आहे. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या या दोन्ही घटनांमागे प्रत्यक्षात एका व्यक्तीचा थरारक गुन्हेगारी कट असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

21 जून 2024 रोजी एका 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शेतात आढळला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याने सुरुवातीला हा बिबट्याचा हल्ला असल्याचा कयास लावण्यात आला. परिसरात त्या काळात बिबट्याची दहशत असल्याने हा निष्कर्ष सहज मान्यही झाला. मात्र वन विभागाने सुरुवातीपासूनच हा प्रकार वन्य प्राण्याचा नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही पोलिसांनी त्या दिशेने गांभीर्याने तपास न केल्याचे आता समोर येत आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये कोणताही वन्य प्राण्याचा अंश नसतानाही तपास पुढे सरकला नाही.
या प्रकरणाला खरे वळण मिळाले ते 19 मार्च 2025 रोजी. त्याच परिसरात आणखी एका बालकाचा मृतदेह आढळल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याने त्यांनी थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांवर दबाव आणला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
तपासादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने दोन्ही खुनांची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही बालकांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात आली होती. या कबुलीनंतर या प्रकरणातील सर्व धागेदोरे स्पष्ट झाले आहेत. सध्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







