Shirur Crime: शिरुर, ता. 06 : वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलावले नाही, या किरकोळ कारणातून निमोणे (ता. शिरूर) येथे एका माथेफिरू तरुणाने शेतकऱ्याच्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत ज्ञानदेव चंदर काळे यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले असून रोख रक्कम, दागिने, कपडे व घरगुती साहित्य असे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने काळे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे.

या प्रकरणी निखिल ज्ञानदेव काळे (रा. निमोणे, भोसवस्ती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. त्यानुसार अक्षय संतोष वाळुंज (रा. शिंदोडी, ता. शिरूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल काळे यांच्या वाढदिवसाला अक्षय वाळुंज याला आमंत्रण न दिल्याने दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या घटनेचा राग मनात धरून अक्षय याने बदला घेण्याची धमकी दिली होती.
रविवारी (ता. 04) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अक्षय याने काळे यांच्या झोपडीवजा घरावर पेट्रोल ओतून आग लावली. आगीच्या प्रकाशामुळे वेळीच जाग आलेल्या कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही मिनिटांतच संपूर्ण घर जळून खाक झाले.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अक्षय वाळुंज हा मोटारसायकलवरून परिसरात फिरत असल्याचे आढळून आले. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गोविंद खटिंग अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या आगीत काळे कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने निमोणे येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिक मदत जमा करून ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले असून पीडित कुटुंबाला मानसिक आधार देण्याचाही प्रयत्न केला जात आहे







