पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड (Sagar Moholkar Death) येथे झालेल्या गोळीबारात जखमी झालेला सागर मोहळकर याचा अखेर पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कधीकाळी कुस्तीच्या मैदानात नाव (Ahilyanagar News) कमावलेला सागर पुढे गुन्हेगारीच्या वाटेला लागला आणि त्याच प्रवासाचा शेवटही हिंसक पद्धतीने झाल्याचे या घटनेतून दिसून आले. (Pune Crime)

4 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास जामखेड तालुक्यात सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला. या हल्ल्यात त्याच्या शरीरात एकूण 5 गोळ्या घुसल्या. सुरुवातीला त्याच्यावर स्थानिक स्तरावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले.
पुण्यात सुमारे 12 ते 13 दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. डॉक्टरांनी त्याच्या शरीरातून 2 गोळ्या काढण्यात यश मिळवले, मात्र उर्वरित 3 गोळ्या महत्त्वाच्या भागात अडकल्या असल्याने शस्त्रक्रिया करणे कठीण ठरत होते. उपचारादरम्यान त्याची ऑक्सिजन पातळी सतत खालावत असल्याने वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करता आली नाही आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
सागर मोहळकर याची पार्श्वभूमीही तितकीच लक्षवेधी आहे. सुरुवातीला पैलवान म्हणून ओळख असलेला सागर पुढे गुन्हेगारीकडे वळला. मारामाऱ्या, दमदाटी आणि खून प्रकरणांमध्ये त्याचे नाव समोर येत गेले. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी झालेल्या वादानंतर तो अधिक चर्चेत आला होता.
या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अभिमन्यू पोते या आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीतून पुणे कनेक्शन समोर आले असून उर्वरित आरोपी कोथरूड परिसरातील असल्याची माहिती आहे आणि ते सध्या फरार आहेत.
ही घटना ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी, गँगवार आणि त्यामागील वैरभाव याचे गंभीर चित्र समोर आणते. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशा घटनांकडे केवळ गुन्हा म्हणून नव्हे, तर सामाजिक समस्येच्या रूपात पाहण्याची गरज अधोरेखित होते.







