पुणे: बाणेर आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरात (Pune News) सुरू असलेल्या गुंतवणुकीच्या चमकदार योजनेचा फुगा अखेर फुटला आहे. टी डब्ल्यू डे नावाच्या कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी 23 जणांविरोधात वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरुवातीला ‘लर्निंग सोल्युशन्स’ नावाने शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्याच्या माध्यमातून विश्वास जिंकला. “शेअर मार्केटमध्ये स्थिर परतावा” देण्याचे आमिष दाखवत अनेकांना या नेटवर्कमध्ये जोडले गेले. त्यानंतर ‘टी डब्ल्यू डे इव्हेंट्स’, ‘टी डब्ल्यू डे आयटी सोल्युशन्स’, आणि इतर बनावट कंपन्यांच्या नावाखाली आकर्षक गुंतवणूक योजना सादर केल्या गेल्या.

आकर्षक परतावा

“₹10 लाखांवर 3%, ₹25 लाखांवर 5% मासिक व्याज” अशी ऑफर देत कंपनीने मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला. पहिल्या काही महिन्यांत वेळेवर पैसे दिल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बसला आणि त्यांनी आणखी निधी टाकला. काहींनी तर कर्ज काढून गुंतवणूक केली.
मार्च 2025 नंतर सर्व पेमेंट थांबले
फिर्यादी प्रार्थना मशीलकर (वय 28) यांनी तक्रारीत सांगितले की त्यांनी ₹32 लाखांची गुंतवणूक केली होती. मार्च 2025 पर्यंत परतावा मिळत होता, मात्र त्यानंतर कंपनीने “आयकर विभागाची चौकशी सुरू आहे” आणि “परदेशी निधी येतोय” अशी कारणं देत पेमेंट थांबवलं.
घोटाळ्याचं जाळं आणि सूत्रधार
या घोटाळ्याचा सूत्रधार समीर आणि नेहा नार्वेकर हे दाम्पत्य असल्याचे समोर आले आहे. दोघांनी टी डब्ल्यू डे इन्शुरन्स, मीडिया, इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्पिटॅलिटी, आयटी सोल्युशन्स अशा 10 पेक्षा अधिक कंपन्या निर्माण करून गुंतवणूकदारांचा पैसा वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवला. एका गुंतवणूकदाराने तर तब्बल ₹2.83 कोटी रुपये गुंतवले होते. या फसवणुकीनंतर अनेक गुंतवणूकदारांवर बँकांचे हप्ते फेडण्याचे संकट ओढवले आहे. पोलिसांनी सबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.







