पुणे:पुणे महापालिकेने (Pune News) मिळकतकर थकवणाऱ्या नागरिकांसाठी जाहीर केलेल्या ‘अभय योजनेत’ मोठा बदल केला आहे. यापूर्वीच्या योजनांचा लाभ घेतलेल्या थकबाकीदारांनाही आता चालू असलेल्या योजनेत दंडावर 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. या निर्णयावर सजग नागरीक मंचने तीव्र विरोध केला आहे.

राजकीय पक्षांच्या मौनावर प्रश्न
सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी टिका केली कि, प्रशासन मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली करण्याकडे मनमानी कारभार करत पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. वेलणकर यांनी माहिती अधिकारात (RTI) मिळवलेल्या आकडेवारीतून मोठा खुलासा झाला आहे. शहरात 2,500 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित राहिली आहे.
महापालिका प्रशासनाने ‘अभय योजना’ जाहीर करताना, ज्या मिळकतधारकांनी आधीच्या सवलतींचा फायदा घेतला होता, त्यांना चालू योजनेत लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट केले होते. कारण, सुमारे 1 लाख 40 हजार नागरिकांनी पूर्वी सवलत घेऊनही त्यांनी पुन्हा मिळकतकर थकवला होता. मात्र, महापालिकेच्या सध्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आता प्रशासनाने सर्वच थकबाकीदारांना या योजनेचा फायदा घेता यावा, यासाठी एक नवा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला, ज्याला लगेचच मंजुरी मिळाली आहे.





