पुणे: पुणे-लोणावळा महामार्गावर पर्यटकांना अमली पदार्थांच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या धक्कादायक घटनेत पुणे ग्रामीण पोलीस दलातील ६ कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, कामशेत पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ४ पर्यटकांचे अपहरण करून त्यांना तब्बल ७ तास ओलीस ठेवले होते, मात्र एका तरुणाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला.

फिर्यादी शुभजीत उमेश शर्मा आपल्या मित्रांसह ५ जुलै २०२६ रोजी कारने (MH 12 WZ 1692) लोणावळ्याला जात होते. रात्री ८:३० च्या सुमारास कामशेत परिसरात आरोपी ६ जणांनी त्यांची गाडी अडवली. गाडीची तपासणी करताना त्यांनी एक सिगारेटचे पाकीट जप्त केले आणि त्यात गांजा असल्याचा खोटा आरोप केला. पोलीस कारवाई टाळण्यासाठी त्यांनी पर्यटकांकडे ५ लाख रुपयांची मागणी केली आणि त्यांना तळेगाव येथील एटीएमवर नेऊन पैसे देण्यास भाग पाडले.

या कठीण प्रसंगात, फिर्यादीच्या मित्राने प्रसंगावधान राखत आपल्या ‘स्मार्ट वॉच’वरून एका मित्राला आणीबाणीचा (SOS) संदेश पाठवला. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत पर्यटकांची सुटका केली. सुरुवातीला हे कृत्य काही गुन्हेगारांचे असावे असे वाटले होते, परंतु आरोपींपैकी ३ कर्मचारी हे हायवे सुरक्षा पथकाचे पोलीस असून ३ जण होमगार्ड आहेत. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आकाश घनश्याम पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







