पुणे : कुस्तीच्या आखाड्यात दोन बलाढ्य मल्ल (Paud News) आमनेसामने आले की प्रेक्षकांचा श्वास रोखला जातो. ताकद, तंत्र आणि जिद्दीची पराकाष्ठा पाहायला मिळते. मात्र मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत रंगलेल्या 11 लाखांच्या इनामी लढतीला गालबोट लागले आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात सुरू असलेल्या अटीतटीच्या झुंजीदरम्यान एका समर्थकाने थेट आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उचलण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. (Maharashtra Kesari)

17 फेब्रुवारी रोजी झालेल्या या हायव्होल्टेज लढतीसाठी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी पौडमध्ये जमले होते. आयोजकांनी कुस्ती निकालीच लावली जाईल, असे स्पष्ट केल्याने दोन्ही पैलवान पूर्ण ताकदीने भिडले होते. सुरुवातीपासूनच चुरशीची झुंज रंगली. जवळपास तासभर दोघेही एकमेकांवर डावपेच आजमावत होते.
वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी झुंज अधिक आक्रमक झाली. माऊली कोकाटेने सिकंदरच्या मानेवर जोरदार पकड घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. सिकंदरने जाब विचारताच काही क्षणांतच बाचाबाची सुरू झाली आणि वातावरण तापू लागले.
याचदरम्यान आखाड्याच्या कडेला उभा असलेला माऊली जमदाडेचा एक समर्थक अचानक आत शिरला. काही कळण्याआधीच त्याने सिकंदर शेखकडे धाव घेत हात उचलण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. आयोजक आणि पंचांची धावपळ उडाली. काही क्षण आखाड्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
स्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने सिकंदर शेखचे गुरु विशाल हारगुळे स्वतः आखाड्यात उतरले. त्यांनी दोन्ही पैलवानांना शांत करत पुन्हा कुस्ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून कुस्तीविश्वात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
तासभर चाललेल्या झुंजीमुळे आणि त्यानंतरच्या वादामुळे आयोजकांसमोर पेच निर्माण झाला. बराच वेळ होऊनही स्पष्ट निकाल लागत नसल्याचे पाहून अखेर आयोजकांनी मध्यममार्ग स्वीकारला. कुस्ती सोडवण्यात आली आणि दोन्ही पैलवानांना विजयी घोषित करण्यात आले.
मात्र या घटनेनंतर आखाड्यातील शिस्त आणि खेळाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पारंपरिक कुस्तीच्या मैदानात समर्थकांचा हस्तक्षेप होणे ही गंभीर बाब मानली जात असून भविष्यात अशा स्पर्धांमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.







