मुंबई: निसर्गाचा नियम मोडून वीजनिर्मितीसाठी पश्चिमेकडे वळवलेले मुळशी धरणाचे पाणी आता पुन्हा आपल्या नैसर्गिक मार्गाने, म्हणजेच पूर्वेकडील भीमा-कृष्ण खोऱ्यात वळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

दशकांपूर्वी मुळशी प्रकल्पाचे पाणी वीजनिर्मितीसाठी कृत्रिमरीत्या कोकणाकडे (पश्चिमेकडे) वळवण्यात आले होते. मात्र, यामुळे पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांवर अन्याय होत असल्याची भावना शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये होती. हे पाणी जर पुन्हा पूर्वेकडे वळवले, तर भीमा आणि कृष्ण खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री स्तरावर यातील पहिल्या टप्प्याला, म्हणजेच ‘पिण्यासाठी पाणी वळवण्यास’ तत्वतः मंजुरी मिळाली होती.
आमदार राहुल कुल यांनी या बैठकीत आग्रही भूमिका मांडली की, केवळ कागदावर निर्णय न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू व्हावी. टाटा पॉवरच्या प्रकल्पातून हे पाणी वळवताना येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे आणि टाटाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील कामाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून युद्धपातळीवर कामाला सुरुवात करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.







