ज्ञानेश्वर शिंदे

मुंबई: मुंबईच्या आझाद मैदानावर आज हजारो महा-ई-सेवा केंद्र चालक आणि आधार केंद्रांच्या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली. ‘अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटने’च्या वतीने आयोजित या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्यांनी आपली एकजूट दाखवून दिली. प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, यासाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.

या आंदोलनाचे मुख्य हेतू म्हणजे शासनाने नवीन महा-ई-सेवा केंद्रांना परवानगी देणे त्वरित थांबवावे. यासोबतच शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींच्या नावे दिली जाणारी केंद्र आयडी रद्द करावीत आणि ‘महासारथी’ पोर्टल बंद करावे, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे. तसेच, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शासकीय दाखले देण्याची सध्याची पद्धत बंद करावी, कारण यामुळे केंद्र चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलक चालकांच्या इतर प्रमुख मागण्यांमध्ये सेवा शुल्कात वाढ करणे, आधार मशिन आणि महा-ऑनलाईनचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कमिशन त्वरित अदा करणे, आणि महा-ऑनलाईनवरील बंद असलेल्या सर्व सेवा पुन्हा कार्यान्वित करणे यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, महा-ई-सेवा केंद्र चालकांना निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.
आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “आता आम्ही अधिक काळ सहन करणार नाही, भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, सरकार आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्व चालकांचे लक्ष लागले आहे.







