पुणे: चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, मोठ्या कंपनीत करिअरची संधी मिळेल, अशा आश्वासनांवर विश्वास ठेवणे 39 कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडल्याचे समोर आले आहे. पुण्यात ‘क्रिएटिव्ह वेब सोल्यूशन’ या कंपनीशी संबंधित व्यक्तींनी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्यानंतर कंपनीच बंद करून पसार झाल्याचा आरोप आहे. या प्रकारात एकूण 77 लाख 91 हजार 400 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

या प्रकरणी फुरसुंगी परिसरातील 39 वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात कंपनीच्या CEOसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून कंपनी सुरू केली आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आकर्षक पॅकेजचे आमिष दाखवले. मोठ्या पगाराची नोकरी हवी असल्यास संबंधित पॅकेजच्या 30 टक्के रक्कम आधीच द्यावी लागेल, अशी अट कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. नोकरी मिळण्याच्या आशेने अनेकांनी ही रक्कम भरली.

तक्रारदार महिलेनेही आरोपींच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून 2 लाख 48 हजार रुपये दिले. त्यानंतर ती कंपनीत नोकरीला रुजू झाली. मात्र, काम सुरू केल्यानंतरही तिला नियमित पगार मिळाला नाही. तब्बल 4 महिने पगार न मिळाल्याने तिच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पैसे घेऊन नोकरी देण्याच्या या प्रकारात आणखी अनेक कर्मचारी अडकले असल्याचे समोर आले. पगार मिळत नसल्याने कर्मचारी कंपनीच्या संचालकांकडे जाब विचारू लागले. मात्र, त्याचदरम्यान कंपनी अचानक बंद करण्यात आली. कर्मचारी कार्यालयात पोहोचले असता कंपनीचे कामकाज बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संबंधित आरोपीही संपर्काबाहेर गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणात अंकुश वानरखेडे उर्फ आशिष रहाटे, तेजश्री खटाळकर, प्रसन्न पद्माकर राव आंबेकर, सागर सुरेश शेळके आणि मानसी मंगेश शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीच्या नावाखाली पैसे घेऊन कंपनी बंद केल्याच्या या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. चतुःश्रृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.






