लोणी काळभोर, ता. २६ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आज अक्षरशः “मृत्यूचा महामार्ग” बनला असून, दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे आणि भीषण अपघातांमुळे नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे. हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या परिसरातून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मात्र, या गंभीर प्रश्नावर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांची भूमिका संशयास्पद शांततेची असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ, रील्स, पोस्ट आणि स्वतःच्या कामांची जाहिरात करण्यात व्यस्त असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रत्यक्ष जनतेच्या प्रश्नांवर मात्र पूर्णपणे गायब असल्याची टीका नागरिक करत आहेत. “कार्यसम्राट” अशी प्रतिमा उभी करणाऱ्या खासदारांनी पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघात आणि रखडलेल्या कामांवर एकदाही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना फक्त सोशल मीडियावर सक्रिय राहून प्रश्न सुटणार आहेत का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
दुसरीकडे, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनीही या महामार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील हजारो नागरिक रोज कोंडीत अडकून त्रस्त होत असताना, रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसताना, विद्यार्थ्यांचे आणि कामगारांचे हाल होत असताना आमदारांकडून कोणतीही आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
महामार्गावरील अर्धवट उड्डाणपूल, सेवा रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमणे, चुकीचे पार्किंग आणि रखडलेली कामे यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. दररोज अपघात होत आहेत, अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे, तर काही कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. सकाळ-संध्याकाळ नागरिकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागत आहे. रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नाहीत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, व्यावसायिक आणि कामगारांना आर्थिक फटका बसत आहे. तरीही खासदार आणि आमदारांकडून फक्त आश्वासने आणि प्रसिद्धीपुरतेच राजकारण सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून दूर पळताना दिसत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असताना, खासदार आणि आमदार यांच्याकडून कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याचे वास्तव आहे.
“जनतेने मतदान करून चूक केली का?” असा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. पुणे–सोलापूर महामार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आणि अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता लोकप्रतिनिधींविरोधात उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. “पुणे–सोलापूर महामार्गाला वाली आहे का?” असा उपरोधिक सवाल आता सोशल मीडियापासून चौकाचौकात चर्चिला जात आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन वाहतूक कोंडी आणि अपघातांवर ठोस आराखडा जाहीर करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
वाहतूक कोंडी सुटली तर जनता मोकळा श्वास घेईल; पण लोकप्रतिनिधींना जाग कधी येणार?
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार उशिरा कामावर पोहोचत आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि सर्वात गंभीर म्हणजे रुग्णवाहिकाही कोंडीत अडकून रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत. त्यामुळे “वाहतूक कोंडी सुटली तर जनता मोकळा श्वास घेईल,” अशी भावना आता नागरिक उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. मात्र, पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींना जाग कधी येणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.







