उरुळी कांचन, ता. 17 : सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदारवस्ती परिसरातील नागरिकांना सध्या मोबाईल नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या भागात वीज पुरवठा खंडित झाला की, तातडीने जिओ आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांचे टॉवरही बंद पडत आहेत. टॉवर चालवण्यासाठी बॅकअप म्हणून असलेले जनरेटर चालू केले जात नसल्याने, वीज जाताच मोबाईलचे नेटवर्क पूर्णपणे गायब होत आहे.

मोबाईल कंपन्या ग्राहकांकडून रिचार्जच्या नावाखाली पूर्ण पैसे वसूल करतात. मात्र, सुविधा देण्याच्या बाबतीत या कंपन्या पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. आजच्या डिजिटल युगात बँकिंग, शिक्षण आणि कामासाठी इंटरनेट अनिवार्य आहे. अशात लाईट गेल्यावर नेटवर्कही बंद होत असल्याने नागरिकांची कामे ठप्प होत आहेत. “पैसे भरूनही आम्हाला त्रास का सहन करावा लागतोय?” असा संतप्त सवाल सोरतापवाडी, इनामदारवस्ती व परिसरातील ग्राहक विचारत आहेत.

टॉवर कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जनरेटर किंवा बॅटरी बॅकअप असणे आवश्यक आहे. मात्र, सोरतापवाडी परिसरात वीज गेल्यानंतर हे जनरेटर चालू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अनेक तासनतास लाईट नसल्यावर हा संपूर्ण परिसर ‘नो नेटवर्क झोन’ मध्ये जात आहे.

दरम्यान, नेटवर्कअभावी गुगल पे, फोन पे यांसारखी महत्त्वाची पेमेंट ॲप्स चालत नाहीत. अशावेळी कोणाशीही संपर्क साधणे कठीण होत आहे. वारंवार तक्रार करूनही मोबाईल कंपन्यांचे प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
याबाबत सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल जगताप म्हणाले, “जर येत्या काही दिवसांत वीज गेल्यानंतरही नेटवर्क सुरळीत राहील, अशी व्यवस्था मोबाईल कंपन्यांनी केली नाही, तर सोरतापवाडी परिसरातील नागरिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. तसेच दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयावर धडक इशारा देण्यात येईल.







