लोणी काळभोर, ता. ७ : पुण्यातील एका नामांकित उद्योगपतीकडे ५० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून कंपनीच्या प्रवेशद्वारावर भरदिवसा गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. हरियाणा व राजस्थानमध्ये सलग पाच दिवस धडक शोधमोहीम राबवत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे उद्योगपतींमध्ये निर्माण झालेली भीती कमी झाली असून, खंडणीसाठी गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारी टोळीला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पवन प्रकाशराम बारड (वय २४), सत्यप्रकाश कालुराम शिलोरा (वय २५), रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा (वय ३३, हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे. तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी एका नामांकित व्यावसायिकाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, खंडणीची मागणी झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत दोन शूटरनी संबंधित कंपनीच्या गेटवर चार राऊंड गोळीबार करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते.

या गंभीर घटनेनंतर पुणे गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोळीबार करणाऱ्या आरोपींची ओळख पटविण्यात आली. मात्र, गुन्हा केल्यानंतर आरोपी हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये पसार झाले होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून संबंधित राज्यांमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. सलग पाच दिवसांच्या कारवाईनंतर २ जुलै रोजी राजस्थानातील हनुमानगड येथून पवन बारड याला अटक करण्यात आली. त्यानंतर ४ जुलै रोजी कंपनीतील माहिती आरोपींपर्यंत पोहोचवणारा कामगार सत्यप्रकाश शिलोरा यालाही अटक करण्यात आली.
त्यानंतर ७ जुलै रोजी पहाटे राजस्थानातील हनुमानगड रेल्वे फाटकाजवळ सापळा रचून मुख्य आरोपी रवीकुमार जांगडा आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपी रवीकुमार जांगडा याच्याकडून एक गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे, तर विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून दोन गावठी पिस्तुले आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
दरम्यान, या संपूर्ण कारवाईत पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये व्यापक शोधमोहीम राबवून आरोपींना जेरबंद केले. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन माने, प्रशांत अन्नछत्रे, अमर कदम यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वीनी सातपुते, पोलीस उप आयुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने , पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष शेटे, पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक जिवन माने, पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, प्रसन्ना जराड, श्रीकांत चव्हाण, छबु बेरड, नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, अभिजीत पवार, दत्तात्रय काटम, दिग्वीजय चौगुले, संदीप कोळपे, योगेश कोतकर महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार व गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.







