पुणे: राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले. या बदल्यांमध्ये विविध महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक, आयुक्त आणि महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाही महत्त्वाच्या विभागांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.

पुणे येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रुपेश जयवंशी यांची मुंबई येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या बदली आदेशात सुधारणा करत आयएएस अधिकारी श्रीधर दुबे यांची नवी मुंबई येथील राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
पुण्याचे महिला व बालकल्याण आयुक्त जगदीश मिनीयार यांची छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोमध्ये मुख्य प्रशासक (नवीन शहरे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांची पुणे येथील महिला व बालकल्याण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर पूर्वीच्या आदेशात बदल करून डॉ. मंगेश गोंदवले यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव पंकज देवरे यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे सह महानगर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
याशिवाय पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त डॉ. मंजिरी मानोलकर यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे विविध विभागांच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळातील प्रशासकीय गरजा आणि विकासकामांना गती देण्यासाठी हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.






