पुणे: पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील ठाकूरवाडी आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक गाड्यांवर परिणाम झाला असून, रेल्वे प्रशासनाने बुधवारीही पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्णपणे सुरळीत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुसळधार पावसामुळे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर रेल्वे मार्ग बाधित झाला. त्यामुळे मंगळवारी एकूण १४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १३ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. याशिवाय आठ गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी-सोलापूर, भुज-पुणे आणि सातारा-दादर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. सीएसएमटी-कोल्हापूर एक्स्प्रेस सीएसएमटी ते खडकी दरम्यान रद्द करण्यात आली होती, तर पुढे ती खडकी स्थानकावरून नियोजित वेळेनुसार रवाना करण्यात आली.
रेल्वे सेवा विस्कळित झाल्यामुळे पुणे आणि मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दक्षिण भारत, गुजरात, मराठवाडा आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या परिस्थितीचा परिणाम झाला.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुणे-मुंबई एसटी बस सेवा पुन्हा सुरू केली आहे. मंगळवारी पुणे विभागातून सुमारे १२० बस मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. तसेच नाशिक मार्गावरील बससेवाही पूर्ववत करण्यात आली असून नियोजित वेळापत्रकानुसार गाड्या सुरू आहेत.
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने रद्द झालेल्या प्रवासासाठी तिकीट परताव्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. एका दिवसात सुमारे ७९ हजार ७४७ प्रवाशांना ५.९१ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. यापैकी पुणे विभागातील २० हजार ९८२ प्रवाशांना १.५६ कोटी रुपयांचा परतावा मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.






