Pune News: उरुळी कांचन, (पुणे) : शेतीच्या जुन्या वादातून तसेच नदीवरील सामाईक मोटार दुरूस्तीचे कारणावरून भरदिवसा कारने मोटारसायकलला जोरदार धडक देत सख्ख्या चुलत भावाचा चुलत भावाने खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली. उरुळी कांचन-भवरापूर मार्गावरील साठे वस्ती परिसरात सोमवारी (ता. 02) दुपारी पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.

महेश लक्ष्मण साठे (वय-32, व्यवसाय शेती, रा. भवरापूर, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अक्षय दशरथ साठे (वय 32, रा. भवरापूर ता. हवेली), व गोकुळ नाना कोकरे (वय 23, रा. आष्टापूर ता. हवेली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मयत महेशचे वडील लक्ष्मण सोपान साठे (वय 58, रा. भवरापूर, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवरापूर येथील जमीन गट क्रमांक 104 संदर्भातील जुना वाद तसेच सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून सोमवरी दुपारी पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास महेश साठे हे झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी पोलीसांनी महेश साठे ला वैद्यकीय तपासणी उरुळी कांचन येथे तपासणीसाठी पाठवले होते.
मयत महेश साठे हे आपल्या हिरो होंडा पॅशन (MH12CJ9551) मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी त्यांच्या हुंदाई आय-20(MH12QY7888) कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक जाणीवपूर्वक देऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 279, 337, 338 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत. घटनेमुळे भवरापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत महेश साठे यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, व चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.





