संतोष मुंडे

पुणे: राज्यात येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर रणशिंग फुंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय गणित अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
महाविकास आघाडीतील स्थानिक नेते एकत्रितपणे निवडणूक लढवावी, यावर आग्रही असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये मात्र भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे. पुण्यात पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा भाजपचे स्थानिक नेते करत आहेत. मात्र, महायुतीतीलच इतर घटक पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व असलेली शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवावी, असा सूर लावला आहे.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी कोथरूड येथे झालेल्या शिवसेना सदस्य नोंदणी व आरोग्य शिबिर कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. “महानगरपालिका निवडणुका महायुतीच्या वतीनेच लढवल्या जाणार असल्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींकडून प्राप्त झाल्या आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “कोथरूड आणि शिवाजीनगर हे मतदारसंघ महायुतीचे बालेकिल्ले राहिले आहेत. येथे शिवसैनिकांनी सातत्याने प्रामाणिकपणे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील लढत महायुतीच्या झेंड्याखालीच पार पडेल.”
आरोग्य शिबिरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. “या उपक्रमामधून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांचे लवकर निदान होऊन उपचार शक्य होतात. महायुती सरकार नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे,” असे सांगत गोऱ्हे यांनी आगामी निवडणुकीसाठी जनतेचा आशीर्वाद मागितला.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोणता गठबंधनाचा फॉर्म्युला अंतिम होतो, याकडे आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.







