विशाल शिंदे

नसरापूर : हवेली, भोर व वेल्हा तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांत कार्यरत भीमसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक नसरापूर चेलाडी येथील श्री शिवाजी विद्यालय कॉन्फरन्स हॉल, तिसरा मजला येथे रविवार (दि. १० ऑगस्ट) रोजी दुपारी १२ ते ३ दरम्यान पार पडली. पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी व स्मारकासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
बैठकीत पुणे महानगरपालिकेने सन २००० साली मंजूर केलेल्या ठरावानुसार मंगळवार पेठेतील ८,९०० चौ.मी. जागा भवनाच्या विस्तारीकरणासाठी तातडीने हस्तांतरित करावी, तसेच ही जागा बिल्डरकडे देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी ठराविक मागणी करण्यात आली. शासन व प्रशासनाकडून २५ वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत असल्याबद्दल भीमसैनिकांनी संताप व्यक्त केला. १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस महाराष्ट्रातील भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया, दलित पँथर, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन महासंघ, भीम आर्मी भारत एकता मिशन, भीम शक्ति सेना, भीमसैनिक संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महासंघ, आंबेडकरी रिपब्लिकन संघटना, महाराष्ट्र दलित मंच, सामाजिक न्याय मंच, बहुजन विद्यार्थी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच, भीम क्रांती दल, आंबेडकरी चळवळ समन्वय समिती, बहुजन समाज पार्टी, मूळनिवासी बहुजन संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कीकवी गावचे आदर्श सरपंच नवनाथ दादा कदम यांचा सर्व संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कदम यांनी त्यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळा-अंगणवाड्यांचे सुशोभीकरण, अत्याधुनिक स्मशानभूमी, सीमेंट काँक्रीट रस्ते व सामाजिक उपक्रम अशा अनेक क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून त्यांची दिल्ली येथील स्वातंत्र्यदिन समारंभासाठी विशेष पाहुणे म्हणून निवड झाली आहे.
दलित पॅन्थर पुणे जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक पप्पू शामराव कांबळे यांनी मार्गदर्शन करताना, “बाबासाहेबांच्या नावाची जागा हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. स्मारक हे भविष्यातील पिढ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र होणार आहे,” असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आभार वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अभिषेक वैराट यांनी मानले.







