पुणे: पुण्यातील येरवडा परिसरात एका क्षुल्लक (Pune Crime) कारणावरून सुरू झालेला वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. दारात मांजराने केलेल्या घाणीवरून सुरू झालेला हा वाद काही मिनिटांतच मारहाणीपर्यंत पोहोचला आणि अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल झाले. (Latest Marathi News)

१८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास यशवंतनगर परिसरात ही घटना घडली. कोमल शिरसागर (वय 29) यांच्या घरासमोर शेजाऱ्यांच्या पाळीव मांजराने घाण केली होती. स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी शेजारी राहणाऱ्या मुन्नी शेख आणि सिबा शेख यांना ती साफ करण्यास सांगितले. मात्र, संबंधित मांजर आमचे नसल्याचे सांगत त्यांनी जबाबदारी नाकारली आणि याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली.
साध्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला संवाद काही क्षणांतच तापला. दोन्ही बाजूंनी शिवीगाळ सुरू झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. आरोपानुसार, मुन्नी शेख आणि सिबा शेख यांनी कोमल शिरसागर यांना भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनीही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले.
जखमी अवस्थेत कोमल शिरसागर यांनी थेट येरवडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत मुन्नी आणि सिबा शेख यांच्याविरुद्ध अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून दोन्ही पक्षांकडून माहिती घेतली जात आहे.







