पुणे: पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाने (गँगवॉर) डोके वर काढले आहे. धनकवडी जवळील बालाजीनगर परिसरात भरदिवसा झालेल्या एका थरारक गोळीबाराने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा संशय असून, यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या संपूर्ण थराराची पाळेमुळे वनराज आंदेकर खून प्रकरणाशी जोडलेली आहेत. ज्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तो वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा सख्खा भाऊ होता. आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा पूर्वनियोजित कट रचून हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.
शत्रूचा गेम करण्यासाठी आरोपींनी भरवस्तीत तरुणाला गाठले आणि त्याच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हा केवळ दोन टोळ्यांमधील वाद नाही, तर यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गजबजलेल्या बालाजीनगरसारख्या निवासी आणि व्यापारी परिसरात भरदिवसा गोळ्या चालतात, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही असे स्पष्ट होते. सध्या पोलिस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.







