पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात एका (Pune Crime) व्यापाऱ्याच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी वेळीच कारवाई करत अपहरणकर्त्यांच्या (Pune Kidnapping) तावडीतून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे. तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने संगमनेर परिसरातून पाच आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार बाबूमल जयस्वानी (वय 47) हे राहटणी परिसरातील शिवराज नगर येथे व्यवसाय करत आहेत. 9 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 5:15 वाजण्याच्या सुमारास ते एका हॉटेलबाहेर उभे असताना काही अज्ञात व्यक्तींनी चारचाकी वाहनातून येत त्यांचे अपहरण केले. आरोपींनी व्यापाऱ्याला जबरदस्तीने वाहनात बसवून घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले असता आरोपींच्या वाहनाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा पाठलाग सुरू केला. आरोपी व्यापाऱ्याला घेऊन पुणे जिल्ह्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी तब्बल 100 किलोमीटर पाठलाग करत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात आरोपींना पकडले. या कारवाईदरम्यान व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी व्यापाऱ्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने हे अपहरण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींची सध्या चौकशी सुरू असून या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलिस करत आहेत.
या घटनेमुळे शहरात व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई करत अपहरणाचा कट उधळून लावल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही सांगितले जात आहे.







