अमित मुंडीक

पिंपरी-चिंचवड: शहरात वाढत्या साखळी चोरीच्या घटनांचा छडा लावत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. बीड जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 5 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या मालामध्ये अंदाजे 28 ग्रॅम 500 मिलीग्रॅम वजनाचे सुमारे 4 लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 1 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या दुचाकीचा समावेश आहे.
8 फेब्रुवारी 2026 रोजी दिघी व पिंपरी परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी पळून गेलेल्या मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान गणेश भारत गिरी (वय 22, रा. बीड) याला अटक करण्यात आली. चौकशीत पिंपरी, दिघी, निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपीवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील साखळी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.







