Crime : माणूसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना औद्योगिक नगरी पिंपरीमध्ये घडली आहे. मित्र म्हटलं की एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे नाते डोळ्यासमोर येते, पण येथे अवघ्या 20 रुपयांच्या उधारीवरून एका मित्राने दुसऱ्याच्या गळ्यावर थेट वार करून त्याला मृत्यूच्या दारात ढकलले. या जीवघेण्या हल्ल्यात रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून, पिंपरी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत फरार आरोपी सत्यजित उर्फ सोन्या कांबळे याला लातूरमधून बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं आणि वादाचं कारण काय?
बुधवारी रात्री 8:15 च्या सुमारास पिंपरी परिसरात ही घटना घडली. रवींद्र आणि सत्यजित हे जुने ओळखीचे होते. सत्यजितने रवींद्रकडे जुन्या उधारीचे 20 रुपये मागितले. मात्र, रवींद्रने पैसे देण्यास नकार देताच सत्यजितचा संयम सुटला. संतापलेल्या सत्यजितने आपल्या खिशातील धारदार चाकू काढला आणि काही कळण्याच्या आत रवींद्रच्या गळ्यावर आणि मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रवींद्रला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने हातात चाकू नाचवत उपस्थित नागरिकांनाही धमकावून तिथे आपली दहशत माजवली आणि अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.
पोलिसांची हाय-स्पीड ॲक्शन
घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपरी पोलिसांनी तातडीने जखमीला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. आरोपी लातूरच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना झाले. अवघ्या काही तासांत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सत्यजितला लातूरमध्ये गाठले आणि त्याला अटक केली.
भररस्त्यात धारदार शस्त्र घेऊन फिरणे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, यातून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते. पिंपरीसारख्या गजबजलेल्या भागात अशा घटना घडल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.






