Bhigwan : भिगवन स्टेशन येथील स्मशानभूमी लगत सुरू असलेला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेस येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला असून सदर प्रकल्प इतरत्र स्थलांतरित करणेची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे की, भिगवन स्टेशन येथील स्मशानभूमी लगत मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामकाजास सुरुवात झालेली असून सदरच्या प्रोजेक्टचे काम तात्काळ थांबवून सदर प्रोजेक्ट इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा कारण, त्या ठिकाणी नाथपंथी डवरी गोसावी समाजाची दफनभूमी आहे त्या ठिकाणी या प्रकल्पाचे बांधकाम झाल्यास त्या दफनभूमी साठी जागा कमी पडणार आहे तरी या प्रोजेक्टमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत.

सदर प्रकल्प अंतर्गत एकूण 40 पेक्षा जास्त गावांचा मैला / घाण त्या ठिकाणी एकत्र होऊन त्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे समजत आहे त्यामुळे भिगवन व परिसरातील नागरिकांना उग्र वासाच्या / दुर्गंधीच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
सध्या ज्या ठिकाणी या प्रकल्पाचे काम चालू आहे त्या लगतच गावातील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कामकाज सुरू असून या प्रकल्पामुळे सदरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पास बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे निवेदनात नमूद केले आहे.यावेळी भिगवन व भिगवण स्टेशन येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
विशेष ग्रामसभेची मागणी :
सदर प्रकल्प सुरू करत असताना भिगवन किंवा भिगवन स्टेशन येथील ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती अथवा कल्पना देण्यात आलेले नाही सदरचा प्रकल्प परस्पर नागरिकांना माहिती न होता,नागरिकांना विश्वासात न घेता,सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रकल्पाची माहिती देण्याकरिता भिगवण स्टेशन येथे स्वतंत्र ग्रामसभा आयोजित करण्यात यावी.आणि सदर ग्रामसभेत सर्वानुमते सदरच्या प्रकल्पबाबत ठराव झाल्यानंतरच त्याचे बांधकाम व इतर काम सुरू करण्यात यावे.अशीही मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा :
सदरचा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प इतरत्र स्थलांतरित न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
भिगवन ग्रामपंचायतचे सरपंच प्रशासक गुरप्पा पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,मासिक सभा आणि ग्रामसभा या मध्ये मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाबाबत ठराव झाला आहे किंवा नाही हे पहावे लागेल मला निश्चित माहित नाही. तसेच ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रामसभा घेऊन त्यामध्ये या प्रकल्पाची माहिती देण्यात येणार असून,सध्या सदरच्या प्रकल्पाचे बांधकाम थांबवण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.







