Baramati : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. राज्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं भव्य स्मारक उभारलं जाईल, तसेच त्यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री म्हणाले, “आज भाषण करताना मन जड झालं आहे. राज्याचे लाडके नेते अजितदादा आणि अर्थसंकल्प यांचं नातं अतूट होतं. त्यांनी अनेक वर्षे वित्तमंत्री म्हणून काम करत राज्याच्या अर्थकारभारात शिस्त आणि नियोजन आणलं.” फडणवीस यांनी सांगितले की, अजित पवारांच्या कठोर आर्थिक शिस्तीमुळे महाराष्ट्राची वित्तीय स्थिती अनेक कठीण काळातही स्थिर राहिली.

अजित पवारांचा उल्लेख करताना फडणवीस यांनी त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. लातूर आणि बारामती विमानतळांवर रात्रीच्या उड्डाणासाठी आवश्यक सुविधा सुरू केल्या जातील, असे त्यांनी जाहीर केले.
28 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8.45 वाजता अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ अपघात झाला होता. विमान धावपट्टीपासून सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळले. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने पायलटला लँडिंग करताना अडचणी आल्या होत्या. दुसऱ्या प्रयत्नात विमान उतरत असताना हा अपघात झाला.
या घटनेनंतर बारामती विमानतळावर नाईट लँडिंग आणि आधुनिक नेव्हिगेशन सुविधांचा अभाव असल्याची चर्चा राज्यभर झाली होती. विमानतळांवर अशी तांत्रिक सुविधा उपलब्ध असल्यास धुकं, कमी दृश्यमानता किंवा रात्रीच्या वेळी विमान सुरक्षितपणे उतरवता येते.
सरकारने जाहीर केलेल्या या सुविधांमुळे केवळ सुरक्षा वाढणार नाही, तर बारामती आणि लातूरसारख्या शहरांचा औद्योगिक व आर्थिक विकासही वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ श्रद्धांजलीपुरता न राहता भविष्यातील पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.







