नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर यांच्यासह कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. या बरोबरच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा ३४ हा कोटा पूर्ण झाला आहे.

दरम्यान ‘भारतीय संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांशी चर्चा केल्यानंतर न्या. चांदूरकर, न्या. बिश्नोई आणि अंजारिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले,’ असे कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विटरवरून सांगितले. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. अभय एस. ओका व न्या. हृषिकेश रॉय निवृत्त झाले. त्यामुळे वरील ३ न्यायमूर्तीची शिफारस करण्यात आली होती.
परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी या येत्या ९ जून रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आणखी एक पद रिक्त होणार आहे. दरम्यान, ७ एप्रिल १९६५ रोजी जन्मलेले न्यायमूर्ती अतुल चांदूरकर हे कायद्याची पदवी घेतल्यानंतर २१ जुलै १९८८ रोजी बार असोसिएशनमध्ये सामील झाले.







