नवी दिल्ली: नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावरील आमरण उपोषणादरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना प्रकृतीच्या कारणास्तव बळाचा वापर करून सफदरगंज रुग्णालयात दाखल केले होते. या कारवाईनंतर सोमवारी सकाळी सोनम वांगचूक यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. जर केंद्र सरकारने त्यांच्या काही प्रमुख अटी मान्य केल्या, तर ते आपले आमरण उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोनम वांगचूक यांनी आपल्या भूमिकेत स्पष्ट केले आहे की, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची आणि बिघडलेल्या शिक्षण व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी. तसेच, त्यांना आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेत जाऊन खासदारांना भेटण्याची परवानगी मिळाली, अथवा संसदेतील नेत्यांनी स्वतः रुग्णालयात येऊन या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवण्याचे ठोस आश्वासन द्यावे, तर ते आपले उपोषण मागे घेतील. सध्या त्यांना रुग्णालयात ठेवून त्यांच्या हालचालींवर व संपर्कावर निर्बंध लादण्यात आले आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलन संपेल असे वाटत होते, परंतु अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याने रविवारी रात्रीपासूनच जंतरमंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. असे असतानाही आंदोलक मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीत. या मोर्चात ठाकरे गट आणि शरद गटही सामील होणार असून पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली असली तरी, या वाढत्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमुळे दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले असून, पुढील घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.







