मुंबई: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील जागावाटपाचा गुंता सुटण्याच्या मार्गावर आहे. दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या अनेक तासांच्या खलबतांनंतर अखेर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचे समजते. राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी सविस्तर चर्चा केली. या मॅरेथॉन बैठकांनंतर काही ठराविक जागा वगळता महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला तयार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास पक्का झाला आहे. यानुसार भाजपला 11, शिवसेना (शिंदे गट) ला 4, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल 48 संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाबाबत जवळपास एकमत झाले आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन मतदारसंघांवर भाजपने आपला हक्क दर्शवला असून, त्यापैकी किमान एका जागेसाठी भाजप आग्रही आहे. याउलट, पुण्याच्या आणि रायगडच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खात्यात जाण्याची शक्यता आहे, तर परभणीचा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सध्या जागावाटपाच्या अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहेत, ज्या पूर्ण होताच महायुतीकडून अधिकृत घोषणा केली जाईल.






