पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर साडेतीन वर्षांनी वाजले असून, बाजार समितीच्या १८ जागांसाठी येत्या ५ जुलै रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.
शिरूर बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर २०२२ मध्ये संपल्यानंतर प्रशासकीय कारभार सुरू होता. अखेर बुधवारी, दि. २७ रोजी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार शुक्रवार, दि. २९ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून, ४ जून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ५ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर २२ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २३ जून रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. येत्या ५ जुलै रोजी १८ जागांसाठी मतदान होईल आणि मतदानानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कांबळे यांनी सांगितले.
बाजार समितीसाठी सेवा सहकारी मतदार संघातून ११ जागांपैकी सात जागा खुल्या प्रवर्गासाठी, दोन महिला प्रतिनिधींसाठी आणि इतर मागास प्रवर्ग व भटक्या जाती-विमुक्त जमातीसाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून चार जागांपैकी दोन जागा खुल्या असून, अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी एक जागा आहे. तसेच, व्यापारी-आडते मतदार संघातून दोन आणि हमाल-मापाडी मतदार संघातून एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे.
दरम्यान, नवीन सहकार नियमानुसार दहा गुंठ्यांपेक्षा अधिक शेती क्षेत्र असलेल्या कोणत्याही गावातील शेतकऱ्याला ही निवडणूक लढविता येणार असल्याने, यंदा उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या बाजार समितीवर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व असले तरी, यंदाच्या निवडणुकीत राज्यातील सत्तेत महायुतीच्या माध्यमातून एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.






