पुणे: देशातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी आता केंद्र सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आणि भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी, या प्रक्रियेची संपूर्ण सुरक्षा आणि गोपनीयतेची जबाबदारी भारतीय लष्कराकडे सोपवण्यावर विचार केला जात आहे. या नियोजनासाठी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, सीबीआयने या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत देशभरात एकूण 13 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातूनच सर्वाधिक अटक करण्यात आल्याचे दिसून येते.
हे रॅकेट पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या उद्देशाने सीबीआयने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत एकूण 49 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक मोबाईल, लॅपटॉप आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यापक फसवणूक प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे युद्धपातळीवर सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी देशभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.






