नवी दिल्ली: नववर्षाच्या सुरुवातीस इंडिया पोस्टकडून (India Post) टपाल सेवांमध्ये महत्त्वाचे बदल लागू करण्यात येत आहेत. 1 जानेवारी 2026 पासून काही आंतरराष्ट्रीय पत्र व लहान पॅकेट मेल सेवा बंद करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला आहे. विकसित होत असलेल्या जागतिक ई-कॉमर्स मानकांशी टपाल सेवा सुसंगत करणे, तसेच ग्राहकांचा अनुभव, सेवा विश्वासार्हता, ट्रॅकेबिलिटी आणि सुरक्षितता वाढवणे हा या सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

‘द इकॉनॉमिक टाईम्स’ च्या एका वृत्तानुसार, सेवा अधिक सक्षम करण्याच्या प्रक्रियेत टपाल विभागाने आंतरराष्ट्रीय पत्र पोस्टमधील काही सेवा तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या सेवांमध्ये ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध नाही किंवा अत्यंत मर्यादित आहे, अशा सेवांचा या निर्णयात समावेश आहे. अधिक जबाबदार आणि ग्राहक केंद्रित पर्यायांना प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर आहे.
युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या नव्या निर्णयांनुसार, 1 जानेवारीपासून नोंदणीकृत लहान पॅकेट सेवा बंद करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर समुद्रमार्गे किंवा हवाई मार्गे परदेशात लहान पॅकेट्स व इतर साहित्य पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध राहणार नाही. बाह्य टपाल वस्तूंसाठी सरफेस लेटर मेल सेवा तसेच सरफेस एअर लिफ्टेड लेटर मेल सेवा बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगण्यात येते. लहान पॅकेट सेवांमध्ये अपुरी किंवा शून्य ट्रॅकिंग सुविधा, वितरणासाठी लागणारा जास्त कालावधी, गंतव्य देशांतील कडक सीमाशुल्क व सुरक्षा नियम, तसेच अनेक परदेशी टपाल प्रशासनांकडून अशा वस्तूंची कमी स्वीकृती या अडचणींवर उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. या बदलांमुळे आंतरराष्ट्रीय टपाल सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि आधुनिक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







