लखीसराय : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. भगवान शंकराच्या जलाभिषेकासाठी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. याच वेळी मंदिर परिसरात अचानक विजेची तार पडल्याने घबराट निर्माण झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

घटनेच्या वेळी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होती. सुमारे 50,000 भाविक जलाभिषेकासाठी रांगेत उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक वीजेची तार खाली पडल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक जण सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावू लागले. त्यामुळे गर्दीमुळे काही वेळातच चेंगराचेंगरी सुरू झाली.

या गोंधळात अनेक भाविक खाली पडले. त्यानंतर गर्दीत चिरडल्याने काहींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने मंदिर परिसरात पोहोचले. वैद्यकीय पथकांनाही घटनास्थळी पाठवण्यात आले. जखमींना त्वरित लखीसराय सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेनंतर मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. तसेच बचाव आणि मदतकार्य वेगाने राबवण्यात आले. दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित असताना सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाची व्यवस्था कितपत होती, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेचे नेमके कारण आणि दुर्घटनेची संपूर्ण परिस्थिती तपासल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.







