पुणे : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’मुळे मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या याद्यांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आली. आधार प्रमाणीकरण आणि ‘ॲग्री स्टॅक’मधील माहितीच्या आधारे संबंधित खात्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यानंतर आता योजनेच्या पुढील प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. नावांमध्ये फरक, दुबार नोंदी तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे सुमारे 12 लाख खात्यांची प्रकरणे बँकांकडे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली आहेत. ही माहिती तपासून दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, यातील जवळपास 80 टक्के प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे नोंदवण्याचे म्हणजेच म्युटेशनचे काम सुरू आहे.

कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यानंतर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. दरम्यान, कर्जमाफीमुळे थकबाकीचा प्रश्न दूर झाल्याने शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी नव्याने पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.








