पुणे: “मतदान केलं, पण पुरावा काय?” असा प्रश्न (Election Ink) आज महाराष्ट्रभरातील अनेक मतदान केंद्रांवर विचारला जात आहे. बोगस आणि दुबार मतदानाला रोखण्यासाठी अस्त्र म्हणून वापरली जाणारी ‘शाई’ चक्क पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत सर्वत्र या ‘मार्कर’ शाईमुळे राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून मतदानासाठी बाटलीतील शाई आणि ब्रशचा वापर केला जात असे, जी एकदा बोटावर लागली की आठवडाभर निघत नसे. मात्र, यंदा निवडणूक आयोगाने ‘मार्कर पेन’ स्वरूपात शाई उपलब्ध करून दिली. अनेक केंद्रांवर शाई लावल्यानंतर काही सेकंदातच ती पुसली जात असल्याचा अनुभव मतदारांना आला. नेलपेंट रिमूव्हर, हँड सॅनिटायझर किंवा हाताला घाम असल्यास ही शाई लगेच निघून जात आहे.
पुण्यात तर काही ठिकाणी मुलं आणि महिला लिक्विडचा वापर करून शाई पुसून पुन्हा मतदानासाठी रांगेत उभे राहत असल्याचा गंभीर आरोप उमेदवारांनी केला आहे. “जर असच चालल तर निवडणुका पारदर्शक कश्या होणार?” असा संतप्त सवाल विरोधकांनी विचारला आहे.







