रांची: एका बाजूला 63 टक्के भाजलेल्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी (Air Ambulance Crash) डॉक्टरांची आणि वैमानिकांची जीवघेणी धडपड सुरू होती, तर दुसरीकडे नियतीने वेगळाच डाव मांडला होता. सोमवारी संध्याकाळी झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील घनदाट जंगलात एक एअर अॅम्ब्युलन्स कोसळली आणि या भीषण अपघातात रुग्ण, डॉक्टरांसह सर्व 7 जणांचा मृत्यू झाला. संजय कुमार, अर्चना देवी आणि डॉ. विकास कुमार गुप्ता, पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा, धुरु कुमार, आणि दोन पायलट कॅप्टन विवेक विकास बिलागत आणि कॅप्टन सवरदीप सिंह यांचा मृत्यू झाला आहे.

मूळचे लातेहार येथील असलेले 41 वर्षीय संजय कुमार एका आगीच्या दुर्घटनेत गंभीर भाजले होते. पेट्रोलियम पदार्थामुळे आग लागली होती. रांचीच्या देवकमल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दिल्लीला हलवण्याचा निर्णय झाला. सायंकाळी साडेचार वाजता विमानाने झेप घेतली, पण वाराणसीच्या हवाई क्षेत्राजवळ असताना अचानक एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) असलेला संपर्क तुटला आणि काही क्षणातच चतरा जिल्ह्यातील सिमरिया परिसरातील जंगलात हे विमान कोसळल्याचे समोर आले.
अपघाताचे नेमके कारण काय असावे?
हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मते, अशा अपघातांमागे प्रामुख्याने दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे ‘तांत्रिक बिघाड’ किंवा ‘हवामानातील अचानक बदल’. ज्या भागात विमान कोसळले, तो भाग घनदाट जंगलाचा आणि डोंगराळ आहे. रात्रीच्या वेळी कमी उंचीवर उडताना तांत्रिक अडचण आल्यास वैमानिकाला सुरक्षित लँडिंगसाठी जागा शोधणे कठीण जाते. ‘एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ (AAIB) आता या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ शोधून अपघाताचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.




