विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रविवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यात अंपायरिंग करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची केवळ ‘रन आऊट’च्या वादातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा विश्वात संतापाची लाट उसळली आहे.

डोला अजित बाबू आणि त्याचा मित्र बुडूमुरी चिरंजीवी हे दोघे या सामन्यात अंपायर म्हणून काम पाहत होते. सामन्यादरम्यान एका ‘रन आऊट’च्या निर्णयावरून खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. अंपायरने मध्यस्थी करून हा वाद तात्पुरता शांत केला, मात्र मैदानाबाहेर बसलेला कांता किशोर नावाचा प्रेक्षक या निर्णयामुळे संतापला होता. त्याने मैदानात येऊन अंपायरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
आरोपी कांता किशोर याने सामना संपल्यानंतर ‘वाद मिटवायचा आहे’ असे सांगून अजित बाबू आणि चिरंजीवी यांना बोलावले. तिथे पुन्हा वाद झाला. दरम्यान, रागाच्या भरात किशोरने लपवून ठेवलेला चाकू काढला आणि अजित बाबूच्या छातीवर सपासप वार केले. जखमी अवस्थेत अजित बाबूला तातडीने अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या तरुण अंपायरचा मृत्यू झाला. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या चिरंजीवीवरही आरोपीने हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला.







