मुंबई : मुंबईत काल पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, तेली यांनी अवघ्या एका वर्षापूर्वीच राणे कुटुंबीयांच्या एकाधिकारशाहीवर टीका करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, एका वर्षातच त्यांनी पक्षाची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

ठाकरे गट सोडण्याचे कारण काय?

राजन तेली यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यामागे कामाची संधी मिळत नसल्याने कारण दिले. त्यांनी बऱ्याचदा संघटना बांधणीचीही मागणी केली होती. मात्र, त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, ‘आम्ही बऱ्याचदा जिल्हाप्रमुख नेमून बूथ स्तरावर संघटना बांधणीची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मग जर संधीच नसेल तर आपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांना कधीच संधी मिळणार नाही.’ असं त्यांनी सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले, “मी कुठलं पद मागितलं नव्हतं. मुद्दा एवढाच आहे की, खालच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची संधी मिळायला हवी आणि लोकांची कामं व्हायला हवीत.” असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
📍 #मुंबई | दसरा मेळावा
पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम तुम्ही केलेत त्यामुळे पक्षप्रमुख नव्हे तुम्ही 'कट' प्रमुख आहात. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर तुमची सावली देखील तुमच्यासोबत राहील की नाही सांगता येत नाही असे सांगितले. यावेळी माजी आमदार राजन तेली आणि माजी आमदार… https://t.co/CUPqWLeOHy pic.twitter.com/4hktLZfnuD
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 2, 2025
दुसरीकडे मात्र, या प्रवेशामागे कर्ज गैरव्यवहाराचे एक प्रकरण असल्याची चर्चा होत आहे. जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, 2021 ते 2022 या काळात कर्ज रकमेचा गैरवापर करून चुकीचे व्यवहार करण्यात आले. या गैरव्यवहारात माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आणि म्हणूनच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या सीबीआय चौकशीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी राजन तेली यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशावर शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, ‘पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम तुम्ही केलेत त्यामुळे पक्षप्रमुख नव्हे तुम्ही ‘कट’ प्रमुख आहात. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर तुमची सावली देखील तुमच्यासोबत राहील की नाही सांगता येत नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतला टीका केली आहे.







