
मुंबई: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ या मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे. यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यांनी बंदर विभाग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित नियोजन पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: रेडिओ जेटी पासून नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक जेटी उभारणीचे प्रस्ताव तयार करावेत असा आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

आज (२ जून) मंत्रालयात वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीला परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, जलवाहतुकीच्या सेवेसाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल आणि विमानतळ प्राधिकरणाला आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले जातील . यासोबतच, मालवाहतुकीसाठी जेटी उभारण्याची ठिकाणे निश्चित करावीत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई-नवी मुंबई जलवाहतुकीची सुविधा, पर्यावरणपूरक प्रवास
मुंबईतील वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू केल्याने मुंबई आणि नवी मुंबई यांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. प्रवासी वेळेची बचत होणार आणि एकाच वेळेस दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवेसाठी इलेक्ट्रिक बोट्स वापरण्यात येणार आहेत, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. प्रवासाची वेळ साधारणतः ४० मिनिटे असण्याची शक्यता आहे. या सेवा सुरू होण्याने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच नागरिकांना आरामदायक, सुरक्षित, आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल.







