मुंबई: महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला पैलवान (Sikandar Shaikh) सिकंदर शेखला (Mharashtra Kesari) पंजाबमधील (Sikandar Shaikh Arrest) शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्याच्या निर्दोष पार्श्वभूमीचा आणि खेळातील उल्लेखनीय कामगिरीचा विचार करून ही दिलासा देणारी निर्णय दिला आहे. सिकंदर शेखच्या नावावर आतापर्यंत कोणताही गुन्हा नोंदलेला नव्हता, ही बाब त्याच्या जामिनाला महत्त्वाची ठरली आहे.

पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्र पुरवठ्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करत सिकंदर शेखसह चौघांना अटक केली होती. पपला गुर्जर टोळीला शस्त्रांचा पुरवठा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणी पंजाबमधील खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चार आरोपींपैकी तिघांवर आधीच खंडणी आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप नोंदलेले असल्याने त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. मात्र सिकंदर शेखचा गुन्हेगारी संबंध नसल्याचे लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.या घटनेनंतर महाराष्ट्रातील कुस्तीविश्वात मोठी खळबळ उडाली होती. राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर अनेक मानाच्या स्पर्धांमध्ये सिकंदरने उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यामुळे त्याचे अटकेत जाणे खेळाडू आणि चाहत्यांसाठी धक्कादायक ठरले होते.
सिकंदर शेखच्या कुटुंबीयांनी त्याच्या निर्दोषतेचा दावा केला आहे. त्याचे वडील आणि माजी पैलवान रशीद शेख म्हणाले की, “माझा मुलगा मेहनती आहे, त्याने प्रामाणिकपणे नाव कमावलं आहे. त्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवलं गेलं आहे. आमचं आयुष्य कष्टाने गेलं, आम्ही कधीही गैरमार्गाचा अवलंब केला नाही. माझा मुलगाही तसंच आहे. तो हिंद केसरी स्पर्धेची तयारी करत होता आणि त्याला खेळू न देण्यासाठी हे डावपेच रचले असावेत.”
दरम्यान, पोलिस तपास अद्याप सुरू असून, सिकंदर शेखची भूमिका नेमकी काय होती हे तपासात पुढे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी या सुप्रसिद्ध पैलवानाला जामिनावर सुटका मिळाल्याने त्याच्या समर्थकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.







